विरूळ रोंघे येथे तीन दिवसीय उपोषणाला अखेर लेखी आश्वासनाने समाप्ती
प्रतिनिधी संतोष वाघमारे
धामणगांव रेल्वे
विरूळ रोंघे येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय उपोषणाला अखेर गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनामुळे समाप्ती झाली. किशोर ओंकार रोंघे व पुष्पा विनोद भोंडे हे आपल्या स्थानिक समस्यांच्या निराकरणासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते.
किशोर रोंघे यांच्या नात्यातील सदस्यांचे घराजवळून जाणारे सांडपाणी भीती शेजारून वाहत त्यांच्या घराच्या आवारात शिरत असल्याने दुर्गंध पसरत होता. हे सांडपाणी योग्य मार्गाने वळवण्यासाठी पाईपलाईन बसवावी व समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
दरम्यान, पुष्पा विनोद भोंडे यांनी त्यांच्या घराकडे जाणारा किमान बारा फूट रस्ता उपलब्ध करून द्यावा, तसेच रस्त्यामध्ये करण्यात आलेला काँक्रीट रट्टा फोडून रस्ता मोकळा करावा, या मागण्यांसाठी उपोषण सुरू ठेवले होते.
या दोन्ही नागरिकांच्या उपोषणाची माहिती मिळताच शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख मनोज कडू व तालुकाप्रमुख नाना देऊळकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी तात्काळ गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांना उपोषण स्थळी उपस्थित राहण्यासाठी विनंती केली.
अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर तीन दिवसांनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
स्थानिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन पुढे सरसावल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.




Post a Comment
0 Comments